रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

आशा आणि त्याग

 ||आपुलाच संवाद आपुल्याशी||

या जगातील माणसाच्या दुःखाचं कारण आशा आहे.बुध्दांने शोधलेले मानवी दुःखाचं मूळ.आशेची पाळंमूळं खणून काढण्यासाठी  माणसाची तडफड आपण अनेक धर्म ग्रंथाच्या पानापानावर  पाहतच आलो आहोत.आशेशिवाय जीवन अशक्य आहे.वैराग्य,निरपेक्ष कर्म,अश्या अनेक संकल्पनाला माणसांनी जन्म दिला.त्यांची उकल करण्यातच आयुष्यभर माणूस झिजत राहिला.वैराग्य,निरपेक्ष कर्म यांचा अनुभव कुणी घेतला असेल बरं?कर्मकांडाचे जोखड आपल्या अंगावरती ओढून माणूस आशा नष्ट करण्यासाठी झुंजत राहिला.कुठल्याचं जीवाची पिच्छा आशा सोडत नाही.

 जीव जीवनलोलूप असतो.मरण कुणालाचं नको असते.ते किती ही अटळ असलं तरी ही. त्याला हजारोवाटा असल्यातरी.

जगण्याची  लालसा जीवाला संघर्षाच्या चरक्यात कोंबते.दुःखाची डोंगरची डोंगर अंगावर कोसळत असतानाही माणूस सुखाच्या क्षणासाठी धडपडत राहतो.

           तुम्ही  असा प्रसंग कधी पाहिला आहे का? नागाच्या जबडयात सापडलेला बेडूक.आपण जबड्यात असून ही समोरचा किटक पकडण्याचा त्याचा प्रयत्न.प्रयत्न केविलवाणा असला तरी जगण्याची लालसा जीवला जुंपून ठेवते. त्या बेडकाच्या जीभेवर वळवळणारी असते ना? ती  आशा  असते.

 आशाचा समूळ नाश अशक्य आहे पण आशा कमी करू शकतो.इच्छा नष्टं नाही पण इच्छेची तीव्रता कमी करू शकतो. छाताडावर गोळया झेलतं मरणाला ही शरण आणणारे अतुलनीय शौर्य आपण पहातोच की.आशेचा त्यागाकडे प्रवास शक्य आहे.त्यागातून ही आनंद मिळतो. त्याग आनंदाचे साधन आहे.

मित्र हो,सोप्पं की मग आनंदाचा मार्ग.आपण योगी नाही पण  जरा त्यागी तर होऊया.बघूया ना आज जमतयं का?

 सुप्रभात...!!!

                परशुराम सोंडगे

          Youtuber|| Bloger||

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

सकारात्मक उर्जा

 || आपुलाच संवाद आपुल्याशी ||

 

माणसाच्या पाणी,अन्न,वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा आहेत.

गरजांचा प्राधान्यक्रम आपल्याला योग्य ठरविता आला की आयुष्याचं पलॅनिंग जमलच की. 

हल्ली गरजांचा प्राधान्य क्रम ठरविताना आपला संभ्रम होतो आहे.आपण नेमकं इथचं  गोंधळून जात आहोत.

या मुलभूत गरजा इतकचं सकारात्मक विचारांनाही आपणं प्राधान्य दिले पाहिजे.श्रींमतीत व ऐश्रर्यात लोळत असलेली व शरीराने धष्टपुष्टं असलेली माणसं ही  मनानं खचलेली असतात तर भिकारी,दरिद्री व विकलांग ही उत्तूंग स्वप्न उराशी बाळगून जग जिंकण्यासाठी धडपडत असतात.

विचारांची उर्जा बाहेरून लपेटता नाही येत.सकारात्मकतेची कॅप्सूल किंवा टॅब्लेट नसते बाजारात.ती अंतरंगातूनचं उसळावी लागते.मानवी पण हे प्रचंड उर्जेचा स्त्रोत आहे. मन ती उर्जा बाहेर फेकत असते.तिच उर्जा माणसाला आतून पेटवते,तेवत ठेवते.प्रखर करते.चकाकी आणते. 

 उलट नकरात्मक उर्जा माणसाला  काळवंडून टाकते.काजळून टाकते.ग्रासून टाकते. निस्तेज करते. शेवटी माणसाच्या विझण्याचे कारण ठरते.

  सुविचार वाचून माणसं सुविचारी होत नाहीत.शाळकरी जीवनात काय आपण कमी सुविचार पाठ करतो? चांगला विचार करणा-या सवयीचं गुलाम व्हावं लागतं.तीच गुलामी माणसाला या जगाचं सिंकदर करत असते.

सकारात्मक विचारच माणसाला आकाश कवेत घेण्याचं बळ देतो.नकारात्मकता माणसाच्या जीवनातील आनंद गोठून टाकते.पंखातले अवसान गिळुन टाकते.नकारात्मकताच माणसाला नैराश्यीच्या गर्तेत ढकलते.सकारात्मकता माणसाला यशाचं शिखरावर घेऊन जाते. सकारात्मकता व नकारात्मकता माणसाच्या विचार करण्याच्या  पध्दती आहेत.फक्त कोणती ही गोष्टं सहज आणि सकारात्मकतेनं घेणं जमलं पाहिजे. ते तेज विलोभनीय असतं.  या शिवाय सक्सेस पासवर्ड  दुसरा नाही.जादूची कांडी हीच तर असते.

 चला,आज सकारात्मकतेने ऊर भरून घेऊया. 

सुप्रभात 

                           परशुराम सोंडगे

                    || Youtuber||Bloger||

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...