मंगळवार, ६ मार्च, २०१८

सोमवार, ५ मार्च, २०१८

युज अॅन्ड थ्रो.

 आबाला बसस्टॉपवर सोडयासाठी आलो होतो. बसस्टॉपवर फार गर्दी होती. नुसती चेंगराचेंगरी... तसल्या गर्दीत शाम्या भेटला. शाम्या काय आमचा क्लासमेट बिट नाही.तेव्ह. आणि आमचा दादा...म्हणजे चुलता.एका वर्गात होते पण त्याला अख्खं गावचं शाम्या म्हणतं. लहान थोर सारेचं. शाम्या नावचं पडलं त्याचं .त्याचा ही कधी धताबाला राग आला नाई. समदचं म्हणतेय गडीच लयं सरळ.आपलं काम जानं नि आपून जानं. तो भेटला म्हणजी.. जरा गडी तारांबळीतच असावा.केस वाढलेले...दाढी वाढलेली...काळी पांढरी...खूटं लयं विद्रूप दिसतं होती. बरं कपडे धड नव्हतं त्याची. बेसूर दिसतं होता. पार कंबरात वाकून नमस्कार केला. अगदी मुजरा केल्यावाणी. "राम राम सायब..."
"काय शामा काका ....कुणीकडे इकडं.?"
 "आता लयं ताप झालायं. तुम्हाला नाही का माहित?"
 "...नाय बुवा.काय झालय?"
 "तेच..ते..इलेक्शनचा राडा."
 "इलेकशनचा राडा...कसला...?"
 "निल्या टाकलायना आत ..."
"आत...निल्या..?"
 "पोलसाडचं जिप्पडचं आल्लतं.उचल्लं पोरगं त्यांनी रातचंच." "पण कमून...?"
"दुसरं काय राजकारणच."
"आर, राजकारणचा तुझा काय सबंध ?"
" कमून थट्टा करता गरीबाची?तुम्हाला माहित नाय व्हयं? घाबडं ....राज्या माग फिरतं होतं. त्याचाचं कुसूर काढला त्यांनी..."
" आत्ता हे राज कोणतं बुवा...?"
 "ते...निखीलराजे कसबे पाटील...पाटल्याचा नातू...प्रतापरावचं पोरगं..?"
 "प्रतापरावच पोरगं..राजं झालय काय..?"
"तेच..ते...लयं बेस्ट गडी...हवा भी लय केली त्यांनी. वट भी जणू त्याचा. नुसती पोरचं माग त्याच्या. गडी आला की पाच पन्नस नव्वाट पोरग गोळा व्हतंय."
"मग...?"
 "मतदानाच्या दिवशी नव्हता उल्लीकसा राडा झाला.बूथावर... त्यांच्या वरूनच बारा पोरं पोलसाडानं उचल्ली. त्यांच झालं राजकारण पण लयं पोरं पिसल्लीत.... पोलसाडचं ती ! त्यांना कुठं दया मया असती व्हयं ? नुसत्या आकडं झाल्लीत. निल्यात पारचं गारं झालंय."
 "मग ते राज नाय काय सोडीत?"
 " त्यांच्या कडचं आल्लतो.सुटत्यालं म्हणतेतं...पाच सहा दिवसात. सुटूनशान तरी काय करतील ? लंय्यं काम करत्याय काय? उग टॅन्शॅन नका घेऊ.उग गप्प मरा".
"मरा की गप्प.."
"निल्याची आय दम खातीयं व्हयं.? ते तर येडचं. हायच खाल्ली. असल्या टायमाला हाय खाऊन जमत का ? राजकारणात  अशा कुरघोडया....डाव असत्यातचं. तस्स त्याला काय कमी...?डब्ब बिब्बं जातेतय..बाहेरून..."
 "मग काय...सुटलचं ना ...आज उदया...करतेलं जामिन.सारं...मॅनेज करतेलं.सत्ता...पैसा.. त्यांच्याकडं काय नाय..?."
" त्यांचं काय करायचं....आपल्याकडं काय ?म्या कधी असल्या लफडयात नाय पडलो बुवा. पोरानी पार मथुरा पाण्यात घातली. असली पोरं मेलेलो बरं."
 " असं त्रागा नका करू. सुटलं...होत असतं. समोर चं भी पडलेले असतेत.पैस गेलेलं असतेत.राग असतोचं. व्हयील कमी."
 "ते टेलर तसचं म्हणत व्हतं "
 "कस्स?"
 "आता पुढचं जे इलेक्शॅन झालं त्यात.या दोन्ही पार्टया एकचं झाल्यात जणू.... काॅप्रमाईज काय ते झालयं जनू."
 "झालं असेल विकासाठी.विकासाच्या मुद्द्यावर एक व्हावचं लागतं. "
"कसला इकास अन् बिकास..वर सारं एकचंअसत्यात.दाखवायचं दात अन् खायचं दात येगळचं असत्यात. आपूनचं येडेत म्हणायचं अन् काय."
 "असं कसं म्हणतोस...आर ते पक्षच वेगळे."
 "मलात काय भी कळत नाय.टकले यांनी केस केली.पोरं जित्राबावाणी पिसल्लेत .ते आणि कसबे राजे एकचं झाल्यात.तसलं कसलं व्हृटस अप काय असतं त्यावर आल्त जणू. दोघ एका ताटात जेवतेत जनू "
"मग..निल्या का म्हणतोय आता.?" "ते कशाच काय म्हणतयं ? नुसतं दाताड काढतं .राजकारण असंचं असतं म्हणतयं.तुम्हाला नाय कळायचं."
 "असं म्हणतयं ?मग ....कळतय की नाय? "
 "नाय बाबा.अस्सलं राजकारण नाय कळतं. कुणाचं वासरूआणि कुणाला पेत.काहीचं मेळ नाय."
 "मग जाऊ दया.... नाय मेळ तर नाय."
 "आता हे झालं माझ...पण निल्याची आय. दम काढती व्हयं ? ते तर येड नुसंत रडतं . मवा निल्या..मवा निल्या .. "
 " काका. आईचं ह्रदय ते. तडफडणाराचं "
 "आर, सारं खरं पण मी तरी काय करू ? माझा जीव तडफडत नाय काय ? ते एक झालेत म्हणल्यावर....कोण लक्ष देत आता या घाबडयाकडं. आपलं नाय शहाणं ...दुस-यावर कशाला टेपूरा." शामा काका हताश वाटला. त्याचं डोळे पाणवलं होतं. गळयातलं भगवं उपारणं काढलं. डोळं पुसलं. त्याचा हुंदका अनावर झाल्ता. त्यानं तो तसाच दाबला. मला ही त्याच्या जखमेवर अजून मिठ चोळायचं नव्हतं.
"येतो ...गाडी लागली आसलं."
            माझ्या पासून तरातरा निघून गेला.मी विचार करत बसलो.राजकारण असं कसं झालं. शामकाकाच्या डोळयातील पाणी मला पाहवलं नाही. अगदी आमने सामने लढणारी नेते एक कसं होतात ?पक्षाची तत्व, जाहीरनामा, विचार यांना काहीच महत्व नसतं का ? एका एका मतावरून सरकार पडलेली याचं डोळयांनी पाहिली. तत्त्वला महत्त्व दिलं गेलं. आता तत्त्वापेक्षा विकासाला महत्तव आलं. विकासाठी एक आलोत. असं ते ठासून सांगत असतात.आता विकास....तर.आपण पहातोच अहोत की....सत्तेसाठी काय पण... हेच होणार असेल.लुटूपुटूचे भांडण होणार असतील.तर आमच्या शामा काकाच्या निल्याचं का व्हावं? सत्तेवर मिळून जाऊ.दोघ मिळून खाऊ.याचसाठी राजकारण असेलतर ....? नागरिकशास्त्रातले शिकलेल्या धडयाचं काय करायचं? बरं.हे कुठं ग्राप....पस...जिपला झालं तरी समजू शकतं.पण डायरेक्ट विधानसभेतचं...अशी तत्व खुटीला अडकवून ठेवू लागल्यावर....लोकशाही चं काय ? आता जन्माची वैरी गळयात गळा घालून फिरायला लागल्यावर... चेल्यांनी...पिल्यांनी काय करायचं? चमचे फिरतील इकडून तिकड... त्यांच काय कसं जमतयं.पण निष्ठावंताचं काय ? निल्याला राजकारण कळत असेल पण त्याच्या आईला हे कसं कळणार? तिनं आपल्या पोराचं आयुष्य...भविष्य उध्दवस्त होतानी कसं पहायचं. असलं राजकारण त्या भोळया मायला थोडचं कळत असतं ? आपल्याला निल्याचं नाही पण त्याच्या आईचं जॅम टेन्शन आलं बुवा...!
                                      परशुराम सोंडगे,पाटोदा,( बीड)
                                          9673400928
                              sahitygandha.blogspot. com

रविवार, ४ मार्च, २०१८

लोकशाही झिंदाबाद

आता आताचं ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या.गाव गावचं पुढारी निवडण्यात आलं.या गाव पातळीवरच्या निवडणूकात भी भारी रंगत आली.नात्या गोत्यात,पावण्या -रावळयातचं फाईटी लागल्या.सख्या सासू-सुना आमने सामने आल्या.भावा भावातल्या दुश्मन्या टोकाला गेल्या.बाप-लेक एकमेकांची उणी धुणी काढु लागले.बाधांवरल्या दुशमन्या गावाचे मोठे प्रश्न झाले.गावातल्या पोरा पोरीची लफडे,मोठयाला माणसाची जुगाड प्रचाराची मुद्दे झाले.जातीजातीचे गटाव झाले.भावकीचे गटाव झाले.तालुक्यातील,परिसरातली नेते मंडळी आपआपला पाऊर वाढण्यासठी गावागावात चकरा मारू लागले.डावपेच रंगलं.कुणी खुटया हाणू लागलं.कुणी गुंडया मनात धरू लागलं.सारं रोडची धाबे फुल्लं चल्लु लागली.पंग झालेली माणसं प्रचार करू लागली.इरोधातल्याची आयमाय उजारू लागले.पापंलेटी,बॅनरं झळकू लागले.गावातली हुशार माणसं बेरजा करू लागले.एक्झीट पोल सांगू लागले.कशाच्या ही वावडया उठया लागल्या.साध्या साध्या गोष्टीवर माणसं हमरी तुमरी येऊ लागले. वातावरण तंग झाले.कवा काडी पडणं कवा भडका उडलं.याचा नेम राहीला नवहता.रातच्या बैठका रंगू लागक्या.एकदंरीत वातावरण चांगलचं तापलं होतं. अशाच एका संवेदनशील बूथ असलेल्या गावात निवडणूकीत मतदान अधिकारी म्हणून माझ्या एका मित्रांची निवड झाली होती.त्यानं सांगितलेली ही घटना आहे.त्यानं सांगितली पण आपल्या सभोवती सरार्स या घटना घडत असतात.आपण तसे याबाबतीत एवढे गंभीर नसतोत.गंभीर तर नसतोतच पण बेजबाबदार ही असतोत. मतदाराला मतदान स्वतंत्रपणे व निर्भीडपणे करता यावे असा प्रशासनाचा प्रयत्न असतो.ते अधिकारी याचा कसून प्रयत्न करत होते.अनेक उत्साही कार्यकर्ते नियमाचं  उल्लघंन करण्याचा प्रयत्न करत होते.अर्थात त्यात स्टंटचबाजीच जास्त असते.मोठयाने आवाज करणे,उगच शिव्या देणं,समोरच्यावर आक्रमण करणे.हे सारं उगचं करणं.दहशत पसरविणे हा त्यांचा उद्देश असतो.कधी कधी आपणच फक्त प्रमाणिक आणि आक्रमक कार्यकर्ता आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
         ती त्यांची गरज ही असते.प्रत्येक धंदयाचं एक कौशल्य असत.राजकारण हा जर धंदा मानला तर अशी नाटक करणं आवश्यकच असते.अभिनय उत्तम करावा लागतो.एखादया कसलेल्या कलाकारापेक्षा ते ग्रेट असतात. नेत्यांना ओरिजनल स्टेज असते. इतर पात्र ही खरे खुरे माणसं असतात.त्यांच्या भावना नाटकी नसतात.ओरिजनलं स्टेजवर हा अभिनय करावा लागतो.एकटयालाच हे करावं लागतं.
असा' शो 'च असतो पण गोंधळ खरा होतो.तो खरा गोंधळ होतो.पोलिस शिपायाची दमछाक होते.अनेक लोक पळत ....पुन्हा येत.मतदान केल्यानंतर तिथचं थांबत.आपल्या मतदानाचा अधिकार बजावून शांत जाणारे मतदार दुर्लभ असतात.गावातील झाडून माणसं मतदानाला आणण्याचा प्रयत्न जो तो करत होता.म्हतारे कोतारे,रानातून छप्परातून आणले जात होते.कुणाला गाडीवर. ...कुणाला चालत,तर कुणाला चक्क पाटकोळी....त्यांना अंधाळे दाखवून मतदान घरातले लोकच ठोकत होते.या वेळी मात्र दोन्ही पार्टया समजदार होतात.विधानसभेत नाही का सारे आमदार एक होऊन स्वत:चं मानधन व भत्ते वाढवून घेत.बहुमताने नव्हे तर सर्वानुमते.
असाच बराचं वेळ गेल्यानंतर एक जर्जर म्हतारी आणली गेली. तिला चक्क उचलूनच आणलं होतं.एका तरूणाने त्याला अजून मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला नसावा .तो इतका लहान वाटत होता.त्याला नुकतचं मिसरूड फुटलं व्हतं.त्याचं तिथ यायचं काहीचं कारण नव्हतं. तो म्हतारीचा सोबती म्हणून आला होता.त्यालाच म्हतारीच मतदान ठोकायचं होतं.आता ज्यालाच मतदानाचा अधिकार नाही त्याला दुस-याच मतदान करण्याचा अधिकार कसा दयायचा? हा प्रश्न अधिका-यासमोर असताना तेवढयात दुसरा ही मुलगा पळतच आला.तो ही म्हतारीचा नातू होता.हा ही नातूच होता.मीच मतदान करणार म्हणून त्यांनं लांबूनच डरकाळी फोडली.जो घेऊन आला होता.त्यान तर अगोदरच दावा केला होता.आता दोघांची तिथचं जुंपली.अर्थात दोन्ही पार्ट्यांचा नेहमीप्रमाणे काही आक्षेप नव्हता.ते म्हतारीचे नातूच होतॆ.अधिका-याने उलट घराच्या भांडणात पडायला नको.त्यांचे आपापले सपोर्टर ही बोलू लागले.प्रश्न हा होता की कोणत्या नातवाला मत ठोकू दयायचे? एकच कालवा झाला.मतदान अधिका-याकडं प्रकरणं आलं. 
 अधिकारी: "आजी,खरच दिसत नाही का ?" 
आजी:" म्या काय दाटून म्हणतेयं काय ? पारं डोळयाचं खाचा झाल्यात की."
अधिकारी:"हे बोट किती?" तीन बोट म्हतारी पुढं दाखवत ते म्हणाले.म्हतारीनं थोडा वेळ घेतला.पटकन उत्तर दिलं. 
'पाच"तसं त्यातलचं एकजण आराडलं,सायेब,म्हतारी काय लबाड बोलती काय? खरच तिला दिसत नाही." सायबाची भी खात्रीच झाली होती.त्यांनी पुढच्या प्रश्न विचारला,"हे दोघ कोण आहेत ?" 
आजी:" हा थोरल्याचं नि हा धाकल्याचायं." अधिकारी:मतदान कुणाला करू दयायचं ?" 
आजी:"या धाकल्याच्याला.इकासला".असं ती म्हतारी म्हणल्या बरोबर थोरल्याचं ते पोरग पारं म्हतारीच्या अंगावरच धावून गेलं आणि म्हणालं,"म्हतारे काय म्हणालीस ?" 
आजी :"काय नाय बाबा तुला देते ना निम्मे.तेव्हचं नातू नि तू नाहीस काय ?"
 नातू :"बघ इचार कर.मतदान मला करू दे."
तो पोरगा डायरेक्टचं दम टाकत होता.हा काय तमाशा आपल्यामुळे झालाय याचं प्रेशर त्या म्हतारीला आलं होतं.तो नातू नंबर दोन जास्तच कालवा करत असल्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आलं.तवा मात्र दोन्ही पार्टया हातघाईवर आल्या.तेव्ह कराकरा दात ओठ खातचं बाहेर गेला.ते पण मोठं रगील होतं.मागं गुरकू गुरकू बघ. सर्व प्रोसीजर झाल्यानंतर त्या नातवांन मतदान केल.मतदान केल्या नंतर तेव्ह खूश झाला होता.ते खुशीतच पळालं बाहेर.म्हतारी राहिली तिथंच.आता म्हतारीला चालता येईना,उठता येईना.ती तिथचं आरडू लागली.बाकीचे म्हतारीला घेऊन बाहेर नेऊ लागले.म्हतारी जाईना."अगोदर त्याला बोलवा.महया इक्कासाला बोलवा."असं ओरडू लागली.इक्कासला मोठयाने चार पाच जणानी हाका मारल्या तवा तेव्ह आला.म्हतारीला हाताला धरून घेऊन जाऊ लागला.म्हतारी तरी जायला राजी होत नव्हती.आता सा-यांनाच काही कळेना की म्हतारीचा असा हट्ट का? "तू अगोदर त्या दोन नोटा दे." 
"चल बाहेर देतो"
 "नाय आता दे.इथच दे.त्या सुभ्याला लगेच माझ्या हाताने देते.तेव्ह आताच डाफरून गेलाय.उग कशाला भांडणाचा कहारं."ती सर्व लोकांकडे पाहत पाहत म्हणाली.लोकांचा काहीच आक्षेप नव्हता.अर्थात तो पण त्याचा घरगुती मुद्दाच होता.फक्त त्यांनी तो घरी मिटवावा एवढीच अपेक्षा होती. बबळच इक्काश्या ओढू लागला.म्हतारी कावाली. ""तू दे आधी...त्याची भी अन् तुझी पण आजीच त्यांनी दिलेत मताला पण मला कोण देतेय.मत माझं आणि मालक हे झालेत.म्हतारी साराचं पोलखोल करील म्हणून त्या नातवानं एक शंभराची नोट काढली.तशी म्हतारी ओरडली,"म्या काय आंधळी काय?पाचश्याची दे" तसा तो विकास नावाचा नातू तिला ओढीतच घेऊन गेला.प्रश्न हा होता म्हतारीला दिसतं होत.ती आंधळी नव्हती.मग ती खोट का बोलली? इक्कासने हे डील केल असेल.म्हतारीच मतदान करून घेतो अस सांगून तिन्ही ही पार्टयाकडून पैस उकळले असणार.लय्यीचं चाप्टर गडया.त्याच्या चाप्टरपणा बाबत सा-यांच एकमत झालं होतं.मतदानाचा अधिकार नसलेला इक्कसही आजच मतदान विकत घेण्याच व्यवहार करतो.त्याला हा देश व्यवहारचतुर म्हणतो.मताचा निलाव केला जातोय.हे सारेच बघतात.नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शिकलेले अधिकार आणि कर्तव्य कुठे शोधायचे?तेव्ह इक्कस मोठा नेता होणार.हे निश्चितच आहे.असे इक्कास गावागावातून शेकडयांनी तयार होत आहेत.भारतीय नसगरिक 'भारत माझा देश आहे'ही प्रतिज्ञा म्हणत लोकशाहीचं ही झिंदाबाद करत राहतील.कुणाला काही डाऊट? परशुराम सोंडगे,पाटोदा sahitygandha.blogspot.com

बळीराजा, कर्जमुक्ती आणि कर्जमाफी वगैरे

कथा आणि व्यथा

बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!!
चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची .
"सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा.
थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? "
धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ."
रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला. गावातल्या पुढा-यांनी फोन केला . आरं बापा कडं पहा जरा .तू तू मी मी नका करू . सारं विसरून जा" पण छया...छया...!! काही फरक पडला नाही .म्हतारं बेशुध्द झालं .
शेवटी दोघ आले .
थोरला: "दादा मी आलो .उठ बर.मी केळ आणलीत चिक्कू आणलेत .खा बर थोडं "
धाकटा: "दादा बघ बदाम आणलेत .बिस्किट आणलीत बघ कपडे आणलीत"
थोरला: "पाणी चांगल शुध्द प्यायला पाहिजे.बघ दादा फिल्टर आणलं ."
धाकटा: ."लय घाण दारात .आजार होणारच.मी पैस देतो. शौचालयच बांधून देतो. "
म्हतारी सारं ऐकत व्हती .ती जरा सटकली म्हणाली , "आरं शाहण्यावं, म्हता-याला दवाखान्यात न्यायचं सोडून हे काय लावलं ?फिल्टारच काय आणताय? संडास काय बांधता ?सारी नाटकचं का ? दवाखान्यात न्या नाहीतर म्हया राजाच्या मातीला सुद्दीक येऊ नका ."

कथेतल्या पोरांसारखंच सरकार निष्ठूर झालं आहे. शेतक-यांच्या रोज आत्महत्या होत आहेत आणि हे धोरण आखताहेत शेतक-याची कर्ज माफी ,कर्ज मुक्तीची मागणी असतानी मुख्यमंञ्याला कशा सुंदर कल्पना सुचतात ? कसे भयकर उपाय सुचतात ? या पेक्षा निष्ठूर कोणं असू शकेल बरं ? काय शेतक-याची व्यथा आहे आणि काय कथा झाली आहे.
. . . . . . . . . परशुराम सोंडगे, पाटोदा
sahitygandha.blogspot. com
https://www.misalpav.com/node/39191या वर ही कथा वाचता येईल
लेखसंस्कृतीकथा



सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...