रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

मैत्र जीवाचे- विणवूया धागे धागे



 माणसाच्या आयुष्यात मैत्रीला फार महत्व असतं.वंशाच्या,कुळाच्या,गावा -शिवाच्या,रक्ताच्या,नात्यापेक्षा ही मैत्रीचं नातं फार महत्वाचं असतं.ऐश्वर्य आणि दारिद्रय, सौंदर्य-कुरूपता, बुध्दी आणि मंद बुध्दी,जाती-पाती,धर्म ,देश- परदेश ,वय  लिंग वगैरे हे असले कृत्रिम भेद झुगारून ख-या  मैत्रीचे धागे अधिक घट्ट होत जातात.हया भेदाच्या सीमा मैत्रीला अडवू नाही शकतं.

मैत्रीचे धागे आपल्या मतलबाच्या चिकट लगदाळीने  गुंफणारी माणसं ही कमी नसतात.अगदीच नाही असे नाही.ह्रदयातून निखळ मैत्रीचे झरे ही खळखळत असतातच की.

आपल्या स्वार्थासाठी माणसं वापरण्याची वेगळीच पंरपरा हल्ली  समाजात निर्माण झाली आहे.मैत्रीच्या बेगडात स्वार्थाचा चेहरा दडवणारे माणसं  ही कमी नाहीत.मैत्री ही  एखादा व्यवहार नसते. ती कुठे हिशोब ठेवते?

निखळ,जीवापाड मैत्र जपणारं कुणीतरी असावे असं सर्वांनाचं वाटतं असतं.तशी आपली सर्वांची एक फॅंटन्सी ही असतेच की.

मैत्र जीवाचे शोधत आपण जगत असतो. जगभर वणवण भटकत असतो. ज्याच्या जवळ आपलं ह्रदय उलगडून दाखवावं अशी माणसं कमी भेटतात.ते विरळचं असतात.

जे भेटले ते प्रामाणिक असतातचं असं नाही.अनेकदा ह्रदय ज्याच्या जवळ उलगडले. त्यांनीच ते वेशीला टांगले. असे ही अनुभव असतात.

आपण ही कुणाचं जीवाच जीवलग असावं असं ही वाटतं की माणसाला. कुणाला आपण जीवलग वाटतं असलो तर ते मैत्र ही आपल्याला जपता आलं पाहिजे. 

 बाॅयफ्रेंड, गर्लफ्रेंड अश्या मैत्रीच्या नवीन फ्रेम तयार झालेल्या आहेत.त्या चौकटीत ही अनेक मैत्री जुळतात.बहरतात ही...तुटतात.विखुरतात.निखळ मैत्रीची सर्वांची मागणी असते.स्त्री-पुरुष हे भेद विसरून मैत्र जपणं तितकसं सोप ही नसतं.ते जपलं जाऊ शकतं.जपतात ही काही लोक.

     आयुष्यात अनेक मित्र भेटले.ते जपले ही अनेक.जीवाचे मित्र काही शत्रू ही झाले.  काही दशकांपूर्वी  मैत्रीचे धागे गुंफले गेले ते अजून ही वरचेवर घट्ट होत आहेत.खांदयावर डोकं ठेऊन रडू शकेल अशी अनेक जीवलग आहेत माझ्या आयुष्यात. ह्रदयात उगाळून लागावं त्यांना असे अधिकार आहेत माझ्यावर त्यांचे.अजून ही माणसं भेटतात. सारेच मित्र नाही होतं.सूर जुळून मैत्रीच गाणं  ही जुळत अधुन मधुन. हे सारं चालूं राहील.सुख-दु:खाचं देणं घेणं सुरूचं राहिलं.त्या शिवाय मैत्री कसं जपलं जाईलं?

आज आठवतात ते मित्र.जे या काळाने कायमचे हिरावून नेलेत माझ्यापासून. डाव मोडलेत अर्ध्यावर त्यांचे.

माझ्या आठवणींच्या झुल्यावर त्यांना झुलतं कायम ठेवले नियतीने.

काही मित्र दूर गेलेत.भेटू पुन्हा...म्हणून जे गेले ते अजून ही भेटत नाहीतं.त्यांच्या भेटण्याची मनी आसं आहे. त्यांचा शोध सुरू आहे. अजून ही ते भेटतं नाहीत?

माणसाच्या ह्रदयावर मैत्रीचा असा काही शिलालेख कोरला जातो असेल का? जो दशकोनोदशके पुसला जात नाही. 

आज दिवसभर आठवतोय माझा एक मित्र.सोनवणे सुधांशू... जीवाचा जीवलग.तीन दशकांपूर्वी बीड मध्ये पाॅलटेक्निकला असताना भेटला होता. आता कुठं तो ? सध्या काय करतोय? कसं चाललेलं असेल त्याचं मला काहीच माहिती नाही.



माझं मज्जेत चाललंय हे त्याला सांगायचं एकदा पण मी त्याला कसं सांगू? आता तो भेटतं नाही.माझ्या दु:खाची,माझ्या संघर्षाची व दारिद्रयाशी मी देत असलेल्या झुंजीची त्याला जाणीव होती. त्याच्या डोळ्यात मला माझ्याविषयीचा एक आपुलकीचा कणव होता. तो कणव मला पुसून टाकायच्या त्याच्या डोळयातला‌.कसा पुसू? तो भेटतचं नाहीये.

सुधांशू, मी आता मज्जेत आहे यार.तुला माझ्या चेह-यावर हसू पाहायचं आहे ना? मग ये ना.बघ, मी हसतो चक्क मज्जेत..!!!

आज मैत्री दिनांच्या निमित्ताने आठवणी ताज्या झाल्या आहेत. अनेकांना 

भेटावसं वाटतंं पण भेटतं नाहीत काही जीवलग...

आपल्या गुणदोषा सहित आपला स्विकार ज्याच्या ह्रदयात सुरू आहे‌ ना? तो आपला सच्चा मित्र असतो. 

बाकी आपल्या ह्रदयाचं खेळणं करणारे, बाजार भरवणारी कमी नाहीत या जगात.मैत्र जीवांचे... सापडत नसतात.त्याचे धागे असतात.ते गुंफावे लागतात.

                                   

               परशुराम सोंडगे, बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...