सोमवार, १ जानेवारी, २०२४

 नविन वर्षाच्या शुभेच्छा......!!!



आज नवीन वर्षाचा पहिला दिवस.रात्री वर्ष २०२३ गेलं.वर्ष २०२४ आलं.बाय बाय २०२३  व वेलकम २०२४.. रात्री बारा वाजता घसाफोड ही झाली.नाचून झाल.गाऊन झालं.

जग कैफात बुडालं. 

भिंतीवरलं एक कॅलेंडर गेलं नि नवीन कोर करकरीत कॅलेंडर आलं. बस्सं एवढच घडलं.

उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून प्रसवणारा  प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परिवलन व भ्रमणगतीत काहीचं फरक पडतं नसतो.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो.फक्त नव्याचा भास असत़ो.

प्राणी पक्षी कीटक यांना नविन वर्षांचं भान नसतं.माणसाला मात्र २०२३ सरलं म्हणून दु:ख होतं.वर्ष २०२४ आलं म्हणून आंनदी ही होतो.काळ तशी मानवी कल्पनाचं. माणसांन त्याला ही आकार दिला.उकार दिला.आपला सखा-सखी करून माणूस त्याच्या प्रेमात ही पडला.

नविन  सालकडून तर किती अपेक्षा....!! निरपेक्ष प्रेम हल्ली कुठं राहिलंय?

सारं शुभ मंगलच घडावं अशी अपेक्षा.अशुभ आमच्या ओंजळीत टाकू नको रे बाबा...!!

खरंतर अनंत ब्रम्हाडांत दिवस उगवत नाही.दिवस मावळत नाही.काळाच्या अनंत रेषेवर ब्रम्हांड सरकते आहे.असेच सरकत राहणार आहे अनंत काल.

     आपल्याला मात्र वाटतं की.नवं वर्षाचं  हे बाळं रांगत या सृष्टीचा कब्जा घेत पण आपण स्वागतच नाही केलं तर? नवं वर्ष रूसून बसेल का? खूप नाचून नाचून स्वागत केलं तर ते वर्ष माणसांना  प्रसन्न होत असेल.आपण नाचत राहतो.नशेत, धुंदीत बुडतं राहतो.आपण स्वागतात कसूर करत नाही. कसूर आपल्याला करायचा पण नसतो.

रांगोळ्या काढतो.डीजे वाजवतो.घरावर रोषणाई करतो.लेजरचे शो करतो. दारू ढोसत राहतो हे नविन वर्षीला आवडतं म्हणून आपण करत असतो का? छे.!छे !!

काळचक्राला कुठं ज्ञानेंद्रिये असतात?

आपल्याला प्याची असते म्हणून आपण पितो. आपल्याला नाचायचं असतं म्हणून आपण नाचतो.आंनद साजरा करण्याची ती आपली पध्दत असते.जो तो आपआपल्या आवडीप्रमाणे सिलेब्रेशन करत असतो.तसा साराच हा भातकुलीचा खेळ असत़ो.खोटं खोटं का असेना पण मज्जा येते ना ? मग खेळायचं.मज्जा महत्वाची.संस्कृती वगैरे गोष्टी पण अश्याच मानवनिर्मितच आहेत ना? कशाला टेन्शन घ्यायचं?

आयुष्य सा-यांनाच असते पण आयुष्याची लांबी सां-याची सारखी नसते.कुणाचं लांब असतं.कुणाचं आखूड असते.जे क्षण आपल्याला वाट्याला येतात.ते फक्त आपले असतात.त्यांना कवेत घेण्याचं काम आपलं असतं.सुख दु:खाचे कण क्षण पाठीवर घेऊन आपल्या वर आदळत असतात.

जगणं म्हणजे एक प्रणयच असतो हवाहवासा, नाही का? दु:ख असून ही सुखाच्या झुल्यावर झुलत ठेवणारा.आपला भुतकाळ आपण बदलू शकत नाही पण वर्तमानाला आपणं भिडवू शकतो.जिंकू ही शकतो.आपण भविष्यकाळ  सुंदर सुंदर स्वप्नांनी व संकल्पनानी सजवू शकतो.नटवू शकतो. सागराच्या किना-यावर नाही का आपण खोपे करतं?

एक लाट आली की सारं होत्याचं नव्हतं होतं. आपण पुन्हा खोपा करतोचं. राहवत नाही.थांबवत नाही.

काळाच्या लाटेत  ही सारं अथांगतेमध्ये मिसळणार असतं पण ते आपण करतचं असतो.करावं लागतं.दुसरं काय करणार ?

                आपल्या हातातच काय आहे?आपलं भविष्य सुंदर स्वप्नांनी सजवू शकतो आपण.सुंदर सुंदर संकल्प करू शकतो.आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न करू शकतो.त्यासाठी प्राण पणाला लावू शकतो.स्वप्नांच्या झालरीनं हे आयुष्य आपण अधिकचं सुंदर करू शकतो. रंगवायचं हे आयुष्य रंगीबेरंगी स्वप्नांनी..संकल्पांनी.दृढनिशचयांनी आखून घ्यायची ही आयुष्याची पायवाट.

एकमेकांसाठी शुभेच्छांनी ओसंडून जायचं.तुटुंब भरून यायचं. एवढं तर नक्की आपण माणसं एकमेकांसाठी करू शकतो.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....नव्या स्वप्नासाठी...आपलं आयुष्य सुंदर सुंदर स्वप्नांनी व संकल्पांनी बहरून यावं.आंनदाचे डोह...आणि तृप्तीचा सागरात तुम्ही आकंठ डुंबत राहो हीच शुभेच्छा....!!



                                




    







       परशुराम सोंडगे


     ||Youtube||Blogger||

गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

भिमा,तू असा सूर्य आहेस .

 








भिमा 

तू,

एक असा सूर्य आहेस

की

मावळलास किती वर्ष झाले तरी

अजून ही तुझा तो प्रकाश 

तसाच आहे.

प्रखर होत गिळतोच आहे

अंधार...

 ती आग ....

अधिकचं तीव्र होतेयं.

युगानुयुगे

तू तसाच तेवत राहणार आहेस

कारण

अंधाराच्या गर्भातच पेरलीस 

तू

प्रकाशाची बीज.

ही पहा ना...

फुललेली असंख्य फुले प्रकशाची.

अंधार तर संपेलच ना आता

एक दिवस...

आमच्या जीवनातला

या जगातला.....

      परशुराम सोंडगे,बीड

.

सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

बापू..!!! तू काही मरत नाहीस.

 तू

या देशाचा राष्ट्रपिता

पण

एखादया जातीच्या झुंडीला,

एखादया धर्माच्या टोळीला,

एखादया वर्णाच्या कळपा


ला,

एखादया मुलखाला

तूर्त तरी

फक्त त्यांचा

वाटत नाहीस.

म्हणून तर 

तू 

या संपूर्ण देशाचा

आहेस.

तुझ्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या

पण


तू 

ठार नाही झालास,

वेडे कुठले.....!!

तू माणूस

नाहीतर विचार आहेस.

हे तर अजूनही

कळतं नाही त्यांना.

तू 

मात्र इथं

मातीच्या कणाकणात

मनात मनात रूजत

गेलास.

म्हणून त्यांनी तुझ्या

मारेक-याचे गौरव सुरू केले.

आणि पोवाडे लिहिले.

तुला रोज मारण्याचा चंग बांधला आहे त्यांनी

पण

तू अशानं काही मरत नाहीस.

तू 

अजून ही अमर होतो आहेस.

छाताडं किती ही 

इंचाची असू दे.

ते फुटूस्तोवर 

फुगू दे.

पण

सदैव या जगात हा देश

गांधीचा आहे

नि

गांधीचाच राहणार आहे.

आणि

तू अमरचं....!!!

   परशुराम सोंडगे,पाटोदा



रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

मैत्र जीवाचे- विणवूया धागे धागे



 माणसाच्या आयुष्यात मैत्रीला फार महत्व असतं.वंशाच्या,कुळाच्या,गावा -शिवाच्या,रक्ताच्या,नात्यापेक्षा ही मैत्रीचं नातं फार महत्वाचं असतं.ऐश्वर्य आणि दारिद्रय, सौंदर्य-कुरूपता, बुध्दी आणि मंद बुध्दी,जाती-पाती,धर्म ,देश- परदेश ,वय  लिंग वगैरे हे असले कृत्रिम भेद झुगारून ख-या  मैत्रीचे धागे अधिक घट्ट होत जातात.हया भेदाच्या सीमा मैत्रीला अडवू नाही शकतं.

मैत्रीचे धागे आपल्या मतलबाच्या चिकट लगदाळीने  गुंफणारी माणसं ही कमी नसतात.अगदीच नाही असे नाही.ह्रदयातून निखळ मैत्रीचे झरे ही खळखळत असतातच की.

आपल्या स्वार्थासाठी माणसं वापरण्याची वेगळीच पंरपरा हल्ली  समाजात निर्माण झाली आहे.मैत्रीच्या बेगडात स्वार्थाचा चेहरा दडवणारे माणसं  ही कमी नाहीत.मैत्री ही  एखादा व्यवहार नसते. ती कुठे हिशोब ठेवते?

निखळ,जीवापाड मैत्र जपणारं कुणीतरी असावे असं सर्वांनाचं वाटतं असतं.तशी आपली सर्वांची एक फॅंटन्सी ही असतेच की.

मैत्र जीवाचे शोधत आपण जगत असतो. जगभर वणवण भटकत असतो. ज्याच्या जवळ आपलं ह्रदय उलगडून दाखवावं अशी माणसं कमी भेटतात.ते विरळचं असतात.

जे भेटले ते प्रामाणिक असतातचं असं नाही.अनेकदा ह्रदय ज्याच्या जवळ उलगडले. त्यांनीच ते वेशीला टांगले. असे ही अनुभव असतात.

आपण ही कुणाचं जीवाच जीवलग असावं असं ही वाटतं की माणसाला. कुणाला आपण जीवलग वाटतं असलो तर ते मैत्र ही आपल्याला जपता आलं पाहिजे. 

 बाॅयफ्रेंड, गर्लफ्रेंड अश्या मैत्रीच्या नवीन फ्रेम तयार झालेल्या आहेत.त्या चौकटीत ही अनेक मैत्री जुळतात.बहरतात ही...तुटतात.विखुरतात.निखळ मैत्रीची सर्वांची मागणी असते.स्त्री-पुरुष हे भेद विसरून मैत्र जपणं तितकसं सोप ही नसतं.ते जपलं जाऊ शकतं.जपतात ही काही लोक.

     आयुष्यात अनेक मित्र भेटले.ते जपले ही अनेक.जीवाचे मित्र काही शत्रू ही झाले.  काही दशकांपूर्वी  मैत्रीचे धागे गुंफले गेले ते अजून ही वरचेवर घट्ट होत आहेत.खांदयावर डोकं ठेऊन रडू शकेल अशी अनेक जीवलग आहेत माझ्या आयुष्यात. ह्रदयात उगाळून लागावं त्यांना असे अधिकार आहेत माझ्यावर त्यांचे.अजून ही माणसं भेटतात. सारेच मित्र नाही होतं.सूर जुळून मैत्रीच गाणं  ही जुळत अधुन मधुन. हे सारं चालूं राहील.सुख-दु:खाचं देणं घेणं सुरूचं राहिलं.त्या शिवाय मैत्री कसं जपलं जाईलं?

आज आठवतात ते मित्र.जे या काळाने कायमचे हिरावून नेलेत माझ्यापासून. डाव मोडलेत अर्ध्यावर त्यांचे.

माझ्या आठवणींच्या झुल्यावर त्यांना झुलतं कायम ठेवले नियतीने.

काही मित्र दूर गेलेत.भेटू पुन्हा...म्हणून जे गेले ते अजून ही भेटत नाहीतं.त्यांच्या भेटण्याची मनी आसं आहे. त्यांचा शोध सुरू आहे. अजून ही ते भेटतं नाहीत?

माणसाच्या ह्रदयावर मैत्रीचा असा काही शिलालेख कोरला जातो असेल का? जो दशकोनोदशके पुसला जात नाही. 

आज दिवसभर आठवतोय माझा एक मित्र.सोनवणे सुधांशू... जीवाचा जीवलग.तीन दशकांपूर्वी बीड मध्ये पाॅलटेक्निकला असताना भेटला होता. आता कुठं तो ? सध्या काय करतोय? कसं चाललेलं असेल त्याचं मला काहीच माहिती नाही.



माझं मज्जेत चाललंय हे त्याला सांगायचं एकदा पण मी त्याला कसं सांगू? आता तो भेटतं नाही.माझ्या दु:खाची,माझ्या संघर्षाची व दारिद्रयाशी मी देत असलेल्या झुंजीची त्याला जाणीव होती. त्याच्या डोळ्यात मला माझ्याविषयीचा एक आपुलकीचा कणव होता. तो कणव मला पुसून टाकायच्या त्याच्या डोळयातला‌.कसा पुसू? तो भेटतचं नाहीये.

सुधांशू, मी आता मज्जेत आहे यार.तुला माझ्या चेह-यावर हसू पाहायचं आहे ना? मग ये ना.बघ, मी हसतो चक्क मज्जेत..!!!

आज मैत्री दिनांच्या निमित्ताने आठवणी ताज्या झाल्या आहेत. अनेकांना 

भेटावसं वाटतंं पण भेटतं नाहीत काही जीवलग...

आपल्या गुणदोषा सहित आपला स्विकार ज्याच्या ह्रदयात सुरू आहे‌ ना? तो आपला सच्चा मित्र असतो. 

बाकी आपल्या ह्रदयाचं खेळणं करणारे, बाजार भरवणारी कमी नाहीत या जगात.मैत्र जीवांचे... सापडत नसतात.त्याचे धागे असतात.ते गुंफावे लागतात.

                                   

               परशुराम सोंडगे, बीड

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

निसर्गाचं वेड पेरणारा कवी-ना.धो.महानोर

 मनामनात झरणारा हिरवा ऋतू.....ना.धो.महानोर
















काही माणसं आपल्याला भेटलेली नसतात.पाहिलेली ही नसतात तरी ते काळजात खोल तळाशी कुठतरी रुतलेली असतात. नकळत रुजलेली असतात.त्यांच आपलं एक अनोखं नातं नकळतं तयार होतं.त्या नात्याला आपण नावं नाही देऊ शकतं पण ते असतं  उत्कटं आणि ओतप्रोत प्रेमात चिंबलेले...आपल्या मनाशी  घट्ट गुंफले गेलेले. नात्यांच्या कृत्रिम फ्रेम मध्ये आपण त्याला बंदिस्त नाही करू शकतं. फ्रेमचं नाही करू शकलो की त्याचा शो पीसं करणं तर अशक्यच असतं.तसंच एक नावं आहे.ना.धो.महानोर.मनाच्या तळाशी एक अनोखं नातं कोरले गेलेले.

कविता गाणी वाचू लागलो.गुणगुणू लागलो तसं ना.धो.महानोर मनात ठसतं गेले.शाळेतल्या पुस्तकातील कवितेतून ते सर्व प्रथम भेटतं गेले.निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य ते उलगडत गेले.सौंदर्याचे पण पदर असतात का? अलवार ते फेडतं गेले की रूपाचं चांदणं पसरतं जाणारे? महानोरच्या  शब्दांनी भारावून टाकलं होतं आमचं तारूणयं...

रान,शिवाराचं अनोख वेडं ते माणसाच्या मनात पेरतं गेले. निसर्ग आणि सौंदर्य.सौंदर्य आणि प्रेम याचं एक नाजुक बंध असतात.मनात आपसुकचं विणले गेलेले.आ

भाळ दाटून आलं की मनभर महानोरांचे शब्द थुईथुई नाचू लागतात.मन रानावनात,शेतात हुंदडतं राहतात.

नभ उतरू आलं

चिंब धरताडं ओलं.

पाऊस..म्हणजे धरती आणि नभाचा प्रणय सोहळाचं की.

या नभाने या भुईला दान द्यावे.

या मातीतून चैतन्य गावे.

पाऊस पडू लागला की पावसानं चिंब ओली रान...त्यांची.गाणी आठवतं राहतात.

दूरच्या रानांत,केळीच्या बनातं

हळदीचे उन्हं कोवळे....

 हे शब्द माणसाला ठार रानवेडं करतात.

चिंब भिजलेली प्रिया...आणि झिमझिमणारा पाऊस... प्रणय धूंद मनात महानोरचे शब्द अलवार मोरपीसासारखे फिरत राहतात.शब्दांना पण स्पर्श असतो का? नाहीतर महानोरचं शब्द कानावर आदळतो राहिले की अंग भर शहारे कशाला उमटतं राहिले असते.

 घन ओथबून येती....किंवा चिंब पावसानं रानं झालं आबादानी

सखे लावण्याची खाणी.....

पावसाप्रमाणेचं उत्कटतेच्या डोहात डुंबत आलेली प्रिया आठवतं राहते.ओढ,हुरहूर ही निसर्गाच्या कणाकणात भेटतं राहते.इतके आपले असणारे शब्दं हा कवी कसं काय लिहू शकतो? असा भाबडा प्रश्न आपल्याला आपसुकचं पडतं राहतो.

शब्द काळजातून कागदावर उमटतं गेले की त्याची जिवंत कविता तयार होते. तिचं तर मनाचा ठाव घेते.आज ही रानांत गेलं की महानोर चे शब्द मनात घोळत राहतात. हिरव्यागार रानात, पिकं तरारून आलेल्या शेतात ,उनाड वारा अंगाशी लगट करताना महानोरांचे शब्द मनात तरळले नाहीतर नवलचं म्हणायचं. 

मला हे कळतं नाही.माझ्या आण्णाच आणि महानोरचं काय नातं असू शकेल? रानांत गेले की महानोरचे शब्द आठवतात नि शब्द आठवले की फाटक्या कपडयातील तुटक्या झोपडीतील माझे आण्णा...!! रानावनात जातं गेलेल्या माणसाचं दु:ख वेदना त्यांचे शब्द नक्कीचं प्रसवत असतील.

या रानांत गुंतलेले प्राण माझे...

तुटकी झ़ोपडी काळीज माझे.

त्यांच्या झोपडीचे नव्हे तर काळजाचे लक्तरे लोंबकळत आहे असे भास होतात. शेतक-याचं जीवन किती कष्टप्रद असलं तरी महानोरच्या शब्दांत त्याची एक वेगळीच श्रीमंती आपणास अनुभवायला मिळते.

माणसाच्या मनात शब्द असे इतकं खरं वाटू शकेल असं साम्राज्य उभे करतात?शब्दांना पण एक अनोखं ऐश्वर्य असतं. दूरच्या  रानांत,केळीच्या बनात... गर्द हिरव्या रानात..हे गाणं ऐकलं आणि रानाची ओढं निर्माण झाली नाही असा माणूस विरळच. 

रान,शेती,शेतकरी आणि त्यांच्या वेदनांना ते शब्द देत राहिले. काळीज अंथरत राहिले.शब्दगंधेला बाहूत घेण्यासाठी तरसणारा हा प्रेमी काळाच्या कुशीत कायमचा विसावला.

हे पटतं नाही.रुचतं नाही. मरणं कुणाला टाळता येत नाही पण असं अचानक त्यांना आपल्यातून असं घेऊन जाणं मनाला चटका देणारं आहे.आता ते या जगात नसतील पण त्यांचे शब्द...कायम आपलं काळीज टोकरीत राहतील....जखमचं फक्त भळभळतात असं नाही.आठवणीचं पण भळभळ  असतेंच की...अनावरं.

इतक्या नको होतं जाणं त्यांचं असं.. सारं सुनं सुनं झालंयंहे जग,शिवाय,रान,बांध,पांदं, डोंगर....वगैरे

मन शब्दाळणं ही अटळचं आहे.


थरथरली वाट हिरवी

शिवार ही हिरमुसले.

गहिवरले हे रान  सारे

हे बांध आश्रूत ओले.

 शब्दगंधे बाहूत तुझ्या.

चैतन्य जरा स्तब्ध झाले.

आठवांच्या भारवात या

मनाचे पारवे सुन्न झाले.


तोडुन काळीज झोपडी.

प्राण रानात फडफडते.

भिजकी वही  वेदनांची

कैवल्य तुम्ह शरण येते.

भावपूर्ण श्रद्धांजली....!!!

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...